इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया,
पाऊल कधी वार्याचे माघारी वळले होते?
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी..
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही-
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
घर माझे शोधाया मी वार्यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो..
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
गीत – सुरेश भट
संगीत –
स्वर- सुरेश भट
गीत प्रकार – कविता