उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया
शतनवसांनीं येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया
कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला, आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारीं जाया?
तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखानें
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया?
सांगुं नये तें आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या
तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया
अधर्म सांगूं कसा बालका
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारीं न्याया
तुझ्यावांचुनी राहुं कशी मी?
वियोग रामा, सांहु कशी मी?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया
तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वराविष्कार- ∙ सुधीर फडके∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग – मिश्र भैरव
गीत प्रकार – गीतरामायण, राम निरंजन
टीप – • गीतरामायण.
• प्रथम प्रसारण दिनांक- ८/७/१९५५
• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- ललिता फडके.