कधी आम्ही गार सावली चाखितो

कधी आम्ही गार सावली चाखितो, कधी उन्हाच्या चटकी
जगणे अमुचे नका विचारू आम्ही पाखरे भटकी

बालपणी बल करांत नव्हते
निराधार ते जीवन होते
जोवर होती आई चोचिण्या कण्या-बाजरी-मटकी

पंख पसरिता उडण्यापुरते
मग घरट्यातील जीवन सरते
चिवचिव करिता कोण ऐकतो साद आमुची लटकी?

पुरे जाहले जातो आता
शोधित फिरतो अपुला दाता
वेळेवर धावेल आमुच्या संकटांचिया घटकी

गीत – अण्णा जोशी

संगीत – अण्णा जोशी

स्वर- राणी वर्मा

गीत प्रकार – भावगीत