बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?
छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत
त्या गाठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात
हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?
गीत – वा. रा. कांत
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर- पं. वसंतराव देशपांडे
राग – पहाडी
गीत प्रकार – भावगीत